आजच्या बदलत्या काळाचे प्रतिबिंब नव्या लेखकांच्या लेखनात उमटत आहे. दीप्ती मडी यांच्या ‘मंचल’ मधील कथाही काळसुसंगत आहेत. पंडितजींबरोबर संसार करणारी, पण त्यांच्या गानसाधनेचा भाग नसलेली त्यांची पत्नी वसुधा व मुलगा अनुराग यांचे एक वेगळे जग निर्माण होते. पंडितजींच्या निधनानंतर त्यांचे स्मारक पट्टशिष्य जगदीशच्या मदतीने उभारले जाते. त्याच वेळेस नातू श्रेयस गायला बसतो. अन एक वर्तुळ पूर्ण झाल्याचे समाधान वसुधाला ‘नांदी’तून मिळते.
‘विराणी’त चित्रा व अभयची नाटकाच्या ऑडिशनला भेट होते. ती त्याच्यात गुंतते. विवाहनंतरही तिचे जग त्याच्यापाशीच घुटमळत राहते. तिने आपल्यावर पूर्णपणे विसंबून न राहता स्वत:चे जग निर्माण करण्यास तो तिला सांगत असतो. त्याच्या आकस्मिक निधनानंतर ती हरवूनच जाते; पण अमृता तिला त्यातून बाहेर काढते अन अभयची ‘चित्राणी’ त्याच्या सावलीतून बाहेर येते. शमा-अजित व त्यांचा अमेरिकेत शिकणारा मुलगा आशू यांचे एक वेगळेच नाते ‘मैफिल’मधून पाहायला मिळते.
पुस्तक : मंचल
लेखक : दीप्ती मडी
प्रकाशक : लिटर्रेजर पब्लिशर्स
पाने : १२४
किंमत : १५० रुपये
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)